हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. अशात हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खरंतर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.
दरम्यान, संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात ८ जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.