• Sat. Sep 21st, 2024

आता फक्त एकच ध्येय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्यादिवशी बुलडोझर चालवायचा: आदित्य ठाकरे

आता फक्त एकच ध्येय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्यादिवशी बुलडोझर चालवायचा: आदित्य ठाकरे

मुंबई: वांद्र येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर हातोडा चालवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सज्जड इशारा दिला. महानगरपालिकेच्या मस्तीखोर आणि माजलेल्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वांद्रे येथील आपल्या शाखेवर हातोडा चालवला. त्या शाखेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता, छत्रपती शिवरायांची मूर्ती होती. मात्र, खोके सरकारच्या आणि अलिबाबाच्या परिवारातील कोणीतरी फोन करुन या शाखेवर बुलडोझर चालवला. त्यामुळे आजपासून कोणताही सभा, मोर्चा किंवा निवडणूक असो, एकच ध्येय घेऊन चाला की, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्या दिवशी या सगळ्यांवर बुलडोझर चालवायचा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयासमोर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी बोलत होते. सध्या मुंबईतील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. चोरांच्या फाईल तयार असून आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी आदित्य यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मुंबईत भगवं वादळ आलं आहे. मुंबई महापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार आहे, असा निर्धार यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांचा ‘जय महाराष्ट्र’, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

यावेळी आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. तुम्ही जी काही चोरी केली आहे, ती आमच्यासमोर आली आहे. तुमच्या फाइल्स बनवल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस येऊन तुमची जागा दाखवणार आहे. पुढची फाइल सही करताना लक्षात ठेवा. दिल्लीचे कितीही आदेश आले, तरी मुंबईला लुटू नका, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच मुंबईतील रस्ते हे पाच लोकांसाठी तयार करण्यात येत असून पाच लोकांना त्याचं काम दिलं जात आहेत असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांचं काम हे पाच झोनमध्ये केलं जात आहे. पाच लोकांना काम दिलं जाऊन त्यामध्ये कमिशन खाल्लं जात आहे. सर्वप्रथम यांनी रस्त्यांच्या किमती वाढवल्या, टेंन्डरमध्ये घोटाळा केला. पाच हजार कोटींच्या रस्त्याची किंमत ६०८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. त्यातून यांनी ४० टक्के कमिशन खाल्ले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश

एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला जात असताना दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गेल्या ३२ वर्षांपासून माझे वडील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. मला चांगल्याप्रकारे आठवत आहे. कोरोना काळात वांद्रे पश्चिम, खार या भागात आम्ही सर्वजण माणसं तसेच जनावरांना अन्न खाऊ घालत होतो. पोलीस आणि मुंबई महापालिकादेखील आमच्यासोबत काम करत होती. आम्ही ठरवलं होतं की, मुंबईत जितके जनावरं आहेत त्यांना अन्न खाऊ घालू. तुम्ही किंवा मी रस्त्यावर नव्हतो तेव्हा त्यांना अन्न खाऊ घालणारं नव्हतं. तेव्हा आपण आम्हाला वांद्रेची एमआयडीसीची संपूर्ण जागा दिली होती, अशी आठवण राहुल कनाल यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed