क्रिकेट चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन जामठा येथील स्टेडियमवर सामने घेण्यात यावेत, असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्राद्वारे केले आहे. देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपूरचे महत्त्व लक्षात घेता यंदाही विश्वचषकातील काही लढती नागपुरात होतील, अशी अपेक्षा क्रिकेट शौकिनांना होती. मात्र, मंगळवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली.
नागपूर वगळता अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा आणि लखनऊ या शहरांमध्ये होणार आहे. नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी शेजारच्या राज्यातील प्रेक्षकही येतात. यानंतरही नागपूरला वगळल्याबद्दल नाराजीयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रिकेट शौकिनांच्या भावना व रोष लक्षात घेऊन विश्वचषकातील तीन सामने नागपुरात आयोजित करावे, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.
जगातील सर्वोत्तम स्टेडियममध्ये जामठा येथील स्टेडियमचाही समावेश होतो. या मैदानावर कसोटी, एकदिवसीय व टी-२०सारखे आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले. त्यास नागपूर-विदर्भातील शौकिनांनी उदंड प्रतिसाद दिला. २०११मध्ये विश्वचषयकातील भारत-दक्षिण आफ्रिकेसह चार महत्त्वाचे सामने याच मैदानावर झाले. मुख्य स्पर्धेपूर्वी याच मैदानावर सराव सामन्यातून खेळाडूंनी सराव केला, याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.
काय म्हणावे ?
देशाच्या मध्यवर्ती असणाऱ्या नागपुरात सर्व सुविधा असतानाही विश्वचषकाचा एकही सामना न होणे आश्चर्यकारक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, मुंबईच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष नागपूरचे आहेत. असे असतानाही एकही सामना न होणे याला काय म्हणावे. बीसीसीआयने आत्मचिंतन करावे आणि किमान एक ‘शो-मॅच’तरी द्यावी, अशी भूमिका राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.
नागपूरकडे दुर्लक्ष
बीसीसीआयचे शशांक मनोहर अध्यक्ष असताना नागपुरात क्रिकेट सामने व्हायचे. अलिकडे बीबीसीआयने नागपूरकडे पार दुर्लक्ष केले आहे. याबाबत फेरविचार करून एक सामना तरी द्यावा, असे आवाहन रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केले.