Mumbai High Court: पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीला अटक केली आणि पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. तसंच एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून गुन्हा सिद्ध करण्यात आला.
पित्याकडूनच होत असलेल्या आपल्यावरील अत्याचाराबाबत आग्रीपाडामधील या पीडित मुलीने आईकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, आईने दुर्लक्ष केले. अखेर दहावीत असताना शाळेत ‘पोलिस दीदी’ कार्यक्रमात मिळालेल्या माहितीनंतर तिने धाडस करून समुपदेशकाला माहिती दिली. ‘दहा वर्षांची असल्यापासून वडील आक्षेपार्ह स्पर्श करायचे. किमान चार वेळा त्यांनी बलात्कार केला’, असे मुलीने जबाबात म्हटले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासह अनेकांचे जबाब नोंदवले होते. नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून गुन्हा सिद्ध केला होता.
विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून 12 मार्च 2020 रोजी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याच्या अपिलावर अंतिम सुनावणी घेऊन राखून ठेवलेला निर्णय न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने सोमवारी जाहीर केला.
‘पालक मुलांना शिस्त लावतात, तेव्हा मुले चिडणे ही सामान्य बाब आहे. परंतु केवळ त्या कारणावरून मुलगी वडिलांवर इतका गंभीर व दूरगामी परिणाम करणारा बलात्काराचा आरोप करेल, असे मानणे अविश्वसनीय आहे’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ‘पीडितेची साक्ष अत्यंत ठाम, सुसंगत व विश्वासार्ह आहे. गुन्हा निर्विवाद सिद्ध झाला आहे’, असा निष्कर्षही खंडपीठाने नोंदवला.
