हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासंबंधी आयएमडी मुंबईकडून इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या तीव्र ते अतितीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर पुढील ३-४ तासांत जळगाव जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट
दरम्यान, आज दिवसभरात नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.
‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
खरंतर, गेल्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.