काशिमिराच्या जनता नगर येथील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बीएसयूपी योजना राबवली जात आहे. मधल्या काळात केंद्र सरकारकडून ही योजना बंद करण्यात आल्याने, योजनेचे रखडलेले काम पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. या इमारतीत एक सदनिका मिळवून देण्यासाठी दहिसरमध्ये राहणाऱ्या दयाराम भारती यांच्याकडून आशीष चौहान याने हरीश चौहान याच्यामार्फत २०१५ साली टप्प्याटप्प्यात सात लाख रुपये घेतले होते. दयाराम यांना त्यांच्या पत्नीच्या नावे एक खरेदीखत तयार करून देण्यात आले. यात हा व्यवहार १९९९ साली झाल्याचे दाखवण्यात आले होते. यासह मिरा-भाईंदर महापालिकेने योजनेसाठी २००९ साली केलेल्या सर्वेक्षणाची कागदपत्रे व एक शिधापत्रकही देण्यात आले होते. ही कागदपत्रे दिल्यानंतर प्रत्यक्षात सदनिका देण्यास मात्र मागील काही वर्षांपासून विलंब केला जात होता. त्यामुळे भारती यांनी स्वतः पालिका कार्यालयात जाऊन माहिती घेतली. यावेळी पालिकेच्या नावे त्यांना दिलेली कागदपत्रे व शिधापत्रक बनावट असल्याचे निदर्शनास आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, भारती यांनी काशिमिरा पोलिस ठाण्यात सदनिकेच्या व्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावरून आशीष चौहान, हरीश चौहान, अमरलाला पाल, मंगल गांधी व दयाशंकर यादव अशा पाच जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.