• Thu. Mar 12th, 2026

    मुंबई महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांवर जबाबदारीची ‘विभागणी’; कोण, कुठले खड्डे बुजवणार?

    मुंबई महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांवर जबाबदारीची ‘विभागणी’; कोण, कुठले खड्डे बुजवणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांवरून होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कुणी, कुठले खड्डे बुजवायचे याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. यासाठी पालिकेचे मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालय यांच्यामध्ये समन्वय ठेवत रस्त्यांची विभागणी करण्यात आली आहे. सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे प्रभाग कार्यालय तर त्याहून मोठ्या रस्त्यांवरील खड्डे मध्यवर्ती कार्यालयामार्फत बुजवण्यात येणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे ही मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरवर्षी रस्तेकामांसाठी हजारो कोटी आणि खड्डे बुजवण्यासाठी शेकडो कोटी खर्च केल्यानंतरही खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. त्यावरून पालिका दरवर्षी टीकेचे लक्ष्य होते. खड्ड्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता मुंबईतील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४०० किमी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच पावसाळापूर्व आणि पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

    गेल्या वर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यावर्षीही या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर कोल्डमिक्स वापरण्यात येणार असून त्याहून मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी रिॲक्टिव्ह अस्फाल्ट व रॅपिड हार्डनिंग काँक्रीट वापरण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता मनीष पटेल यांनी दिली.

    देखभालीवरून वाद

    यंदा ज्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यांच्या देखभालीची, खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे. मात्र कंत्राटदारांनी ज्या रस्त्यांची अद्याप जबाबदारी देण्यात आलेली नाही त्या रस्त्यांची देखभाल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत त्या रस्त्यांची देखभाल पालिकेला करावी लागणार आहे. पालिका या देखभालीचे पैसे कंत्राटदारांच्या बिलातून वळते करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला
    …खड्ड्यांची तक्रार येथे करा

    पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेने मुंबईकरांना साद घातली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असून २२७ प्रभागांतील रस्ते अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. तसेच MCGM 24×7 हा मोबाईल ॲप उपलब्ध करण्यात आला आहे. गुगल प्ले स्टोअरमधून हा ॲप डाऊनलोड करता येईल, असे महापालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed