सरपंचपद आदिवासी जातीसाठी आरक्षित झालं अन् लागली लॉटरी
दहेली तांडा हे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं गाव आहे. या गावात जवळपास दोन हजार लोकवस्ती आहे. बंजारा समुदाय येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मुस्लिम कुटुंबही आहेत. दहेली तांडा २५ वर्षांपूर्वी दहेली गाव आणि दहेली तांडा ग्राम पंचायत वेगळं झाल्यानंतर दहेली ग्राम पंचायतीच सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी आरक्षित झालं. त्यामुळे आदिवासी समाजातील एकमेव कुटुंब असल्याने रामदास तोडसाम यांना सरपंचपदाची संधी मिळाली. त्यानंतर सलग चार वेळा सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी कायम राहिलं. रामदास तोडसाम यांनी दहा वर्षे सरपंच तर त्यांची पत्नी पार्वतीबाई तोडसाम ह्या पाच वर्ष, मुलगा राजेंद्र तोडसाम हे पाच वर्ष आणि आता त्यांची सुनबाई मनीषा जयवंत तोडसाम सरपंच म्हणून काम पाहत आहेत. या ग्राम पंचायतीत ९ सदस्य आहेत.
पत्र्याच्या घरात सरपंचाचं कुटुंब
एखाद्याला सरपंचपद मिळाल्यानंतर त्याच्या राहणीमानात बदल होत असतो. गाडी घोडी सोबतच आलिशान घरही बांधत असतो. तोडसाम कुटुंब २५ वर्षांपासून सरपंचपदावर आहे. मात्र आजूनही मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत आहे. एवढचं नाही तर दोन विटाच्या खोल्या आणि वरून पत्रा आहे. घरात सरपंचपद असून यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाही. शासनाने घरकुलचा लाभ द्यावा, अशी विनंती तोडसाम कुटुंब करत आहे. गावाचा विकास झाला आहे. पण सरपंच असूनही कुठल्याच योजनेचा स्वत:साठी लाभ घेतला नाही, हे विशेष. शासनाने अशा कुटुंबाची दखल घेतली पाहिजे, असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.