नांदेड -विशेष प्रतिनिधी
किनवट आगामी काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची, समाजमंदिराची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा व अशा मागणीचे निवेदन नगरसेवक अभय नगराळे यांनी किनवट नगर परिषदेला दिले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्यात शहरात ठिकठिकाणी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी नगर परिषदेने तातडीने शहरांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महात्मा ज्योतिबा फुले पुतळा व समतानगर येथील समाज मंदिराची आकर्षक रंगरंगोटी करावी आणि पुतळा परिसरात स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत जयंतीच्या काळात परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था आणि रोषणाई करण्याची मागणीही नगरसेवक अभय नगराळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीमुळे जयंती उत्सव समिती आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
