• Sat. Sep 21st, 2024
सोलापुरात वाळू माफियांचा उच्छाद; ग्रामपंचायत सदस्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, अजूनही कोमात

सोलापूर: अवैध वाळूचोरीला विरोध केल्याने बार्शी तालुक्यातील खांडवी गावच्या ग्रामपंचायत सदस्याला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वाळू माफियांनी ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण केल्याने बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असली तरी सदर प्रकरणातील जखमी दळवी हे बेशुद्ध असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवला गेला नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान, महसूल प्रशासन या सर्व प्रकरणावरून चिडीचूप आहे. त्यांनी या घटनेची अद्याप कुठलीही दखल घेतली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश पांडुरंग दळवी हे खांडवीचे ग्रामपंचायत सदस्य असून माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. दळवी दि.१९ जून रोजी मध्यरात्री एक वाजता गावाशेजारील ओढ्याजवळून जात होते.त्यावेळी ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे पाहून आकाश दळवी यांनी ताबडतोब या चोरीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले.यानंतर दळवी यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना अडविण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

दळवींना पाहून वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरचालक आणि जेसीबीचालक आपली वाहने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आकाश दळवी यांनी वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळू माफियांनी आकाश दळवी यांना रस्त्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत दळवींच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार चाप; दंड न भरल्यास मालमत्ता करणार जप्त
ग्रामपंचायत सदस्य बेशुद्ध असल्याने फिर्याद नोंद नाही:
आकाश दळवी हे जखमी झाल्यापासून अजूनही बेशुद्ध आहेत.दळवींवर सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण, दळवी बेशुद्ध असल्याने काहीही नोंद झाली नाही.ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांना संशयित आरोपींबाबत काहीही माहिती नाही. मंगळवारी आकाश दळवीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.त्यांनी चार दिवसांपूर्वी बार्शीचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तालुक्यात पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये तालुक्यातील मटका, जुगाराचे अड्डे, अवैध गौण खनिज उत्खनन, गांजा व तत्सम अमली पदार्थांची वाहतूक, रेशनिंग धान्याचा काळा बाजार आदी अवैध व्यवसाय यावर कारवाई करावी असे म्हटले होते. निवेदन देऊन चार दिवस उलटल्यानंतर हा हल्ला झाला आहे.

गाडीला वाळूमाफियाचा कट, रस्त्यात वाळू ओतली; बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबत रात्री धक्कादायक प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed