• Sat. Mar 7th, 2026
    Sukhoi Crash: बारा वर्षांत सुखोईचे आठ अपघात; भारतीय वायुसेनेच्या प्रगत लढाऊ विमानावर प्रश्नचिन्ह

    Sukhoi Fighter Jet Crash: सुखोई हे भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. मात्र, गेल्या बारा वर्षांत आठ वेळा ही विमाने अपघातग्रस्त झाली आहेत.

    बारा वर्षांत सुखोईचे आठ अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    निखिल भुते, नागपूर : आसाममधील कार्बी आंगलाँग परिसरात भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० एमकेआय हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री कोसळले. यात भारतीय हवाई दलाच्या दोन वैमानिकांना वीरमरण आले. या अपघातामुळे पुन्हा एकदा या प्रगत लढाऊ विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या मल्टिरोल फायटर जेटचा वापर हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले तसेच पाळत ठेवण्याच्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी केला जातो. तरीही तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ही विमाने क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश वेळा वैमानिकांनी ‘इजेक्ट’ करून स्वत:ला सुखरूप केले असले तरी, तीन वैमानिकांना वीरमरण आले आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई विमानांची उपयोगिता वादातीत आहे. मात्र, नियमित कालावधीनंतर होणाऱ्या अपघातांमुळे सुखोईच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    ‘चीनद्वारे हॅकिंगची शक्यता’
    सुखोई विमान कोसळण्यामागे चीनचा हात असू शकतो, अशी शक्यता कर्नल (निवृत्त) अभय पटवर्धन यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सुखोई हे अतिशय उत्कृष्ट विमान आहे. आपले वैमानिकदेखील प्रशिक्षित आहेत. तरीदेखील सातत्याने होत असलेल्या अपघातांमागे चीनचा हात असण्याची शक्यता आहे. तिबेटच्या सीमेवर चीनने गावे वसविली आहेत. अरुणाचल सीमेवर मोठे रेडिओ टॉवर उभे केले आहेत. त्या माध्यमातून या विमानांचा डेटा हॅक करून हे अपघात घडविले जात असावेत. काही वर्षांपूर्वी मी या भागात गेलो होतो, तेव्हा चीन उभारत असलेल्या या टॉवरचे काम जवळपास पूर्ण झाले होते’, अशी माहिती त्यांनी दिली.

    असे झाले अपघात…
    ४ जून २०२४ : नाशिक, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
    २८ जानेवारी २०२३: मध्य प्रदेशात सुखोई अणि मिराज या विमानांची टक्कर (मिराजच्या वैमानिकाचा मृत्यू)
    ८ ऑगस्ट २०१९ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
    २७ जून २०१८ : नाशिक, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
    २३ मे २०१७ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिकांचा मृत्यू)
    १५ मार्च २०१७ : बाडमेर, राजस्थान (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
    १९ मे २०१५ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
    १४ ऑक्टोबर २०१४: पुणे, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा