पाऊस लांबणीवर पडल्यास प्रशासनाला नाइलाजाने आणखी पाणीकपात जाहीर करावी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गत वर्षी आजच्या तारखेला धरणात २२.०६ टक्के पाणीसाठा होता. तो तुलनेने यंदा १.६६ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. गत वर्षी पाणलोट क्षेत्रात दोन हजार ७७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरण तीन वेळा १०० टक्के भरले होते. ऑगस्टअखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. शहराला २५ नोव्हेंबर २०१९पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षे झाले, तरी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.
आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाला असून, टप्प्याटप्प्याने आणखी ५० एमएलडी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. गेल्या काही दिवसांत पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. मात्र, एक जूनपासून आत्तापर्यंत सरासरी २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. निम्मा जून महिला सरला, तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहर परिसरातील पवनेसह, भामा-आसखेड, आंद्रा, कासारसाई या धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. पावसाने ओढ दिल्यास पाण्याचे संकट गहिरे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मावळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या अद्याप केलेल्या नाहीत. साधारण पेरण्या केल्यानंतर अनेक शेतकरी आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. मात्र, यंदा पेरण्याअभावी अनेक जण सहभागी झाले आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आषाढी वारी पूर्ण करून शेतातील कामे करता येतील, या आशेवर शेतकरी आहेत.
परिसरातील धरणातील एकूण पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टक्क्यांत)
पवना = १९.९१
आंद्रा = ४०.३३
कासारसाई = २०.४९
भामा-आसखेड = २५.७०
जूनमधील तुलनात्मक पाणीसाठा
२०२२ मध्ये – २२.०६ टीएमसी
२०२३ मध्ये – २०.४० टीएमसी