• Sat. Sep 21st, 2024

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : उशिराने का होईना अखेर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून पाणीकपात लागू केली जाणार होती. परंतु, मंगळवारी काटई इथे जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पुढील आठवड्यात पाणीकपातीची अंमलबजावणी होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापूर्वीच पाणीकपात लागू झाली आहे. २०२० ते २०२२ अशी सलग तीन वर्षे ठाणे जिल्ह्यात पाणीकपात करावी लागली नाही. ती परंपरा चौथ्या वर्षी मात्र खंडित झाली आहे.

यंदा नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांनी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीकपातीचा निर्णय घ्यावा, असे आदेश मार्च महिन्यात दिले होते. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई महापालिकेनेही पाणीकपात लागू केली.

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त पाणीपुरवठा एमआयडीसीमार्फत केला जातो. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि शहरांना घरगुती वापरासाठी एमआयडीसी दररोज ९०४ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. कल्याण-डोंबिवली महापालिका ३६० दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरण- ३१६ दशलक्ष लिटर तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते. बारवी धरणातून दररोज १२०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. आंद्रा धरणातून भिवपुरीच्या टाटा विद्युत प्रकल्पाद्वारे ८०० दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते.

पाऊस लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या अतिरिक्त ४५ दिवसांच्या पाण्याच्या नियोजन करण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच पाणी कपात करण्याची आवश्यकता होती, परंतु तब्बल दीड महिना उशिरा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एमआयडीसीने हा निर्णय घेतला आहे. त्यातही आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याऐवजी १५ दिवसांनी पाणीकपात केली जाणार आहे. पाऊस पडून धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत ही पाणी कपात कायम राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अपव्यवय टाळावा, असे आवाहन पाणीपुरवठा यंत्रणांनी केले आहे.

या विभागांना फटका बसणार

एमआयडीसीकडून ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई,मीरा भाईंदर, अंबरनाथ येथील औद्योगिक वसाहती आणि घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भागात १५ दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

काटई नाका येथे जलवाहिनी फुटली

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मुख्य जलवाहिनी काटई नाका येथे अचानक फुटल्याने मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती वापरासाठी तसेच औद्योगिक वसाहतींसाठी पाणीपुरवठा होतो. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे प्रशासनाने कळवले.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरात कोणत्या दिवशी कुठल्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार? संपूर्ण यादी
आजचा उपलब्ध पाणीसाठा

ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणात २३ मे रोजी ३३.७९ टक्के तर पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंद्रे धरणात ३६.७६ टक्के पाणीसाठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed