पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी अमन शर्मा हा या मुलीला आझमगढमध्ये भेटला होता. त्याने आपण अविवाहित असल्याचे त्या मुलीला सांगितले आणि लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तो तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत राहिला. त्यानंतर आपण घरातून पळून मुंबईला जाऊ आणि तिथे लग्न करू असे तिला म्हणाला. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून १८ मे या दिवशी ति त्याच्यासोबत मुंबईला निघाली.
त्याने आपल्या सोबत आपल्या पत्नीलाही घेतले होते. ही माझी वहिनी आहे असे त्याने मुलीला सांगितले. आपण लग्न केल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी वहिनीला सोबत आणल्याचे तो म्हणाला. अशा प्रकारे २० मे रोजी तिघेजण मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर उतरले.
त्यानंतर अमनने दोघांना सांगितले की तुम्ही रेल्वे स्थानकावर फ्रेश व्हा. त्यानंतर तो बाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या एका रिक्षा चालकाला विचारले की येथे जवळपास रेडलाइट एरिया कुठे आहे. एका मुलीला ४० हजार रुपयांत मला विकायचे आहे, असेही तो रिक्षा चालकाला म्हणाला. त्याने असे सांगितल्याबरोबर रिक्षा चालकाने तत्काळ टिळक नगर पोलीसांशी संपर्क आणि केला आणि माहिती दिली.
रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास राठोड यांनी पोलीस उपनिरीक्षक बबन हरळ यांना रेल्वे स्थानकावर पाठवले. हरळ हे त्या मुलीसह जोडप्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहरण आणि मानवी तस्करीचे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.