• Mon. Sep 14th, 2026
नवी मुंबईतून आठ बांगलादेशी घुसखोर अटकेत; ४ महिला, ४ पुरुषांचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : कामोठे सेक्टर-२२मधील चाळीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी छापा मारून अटक केली. या कारवाईत पकडलेल्यांमध्ये चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करून, तसेच घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.काय आहे प्रकरण ?

कामोठे सेक्टर-२२ मधील मैदानालगतच्या चाळीत काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या चाळीतील घरावर छापा मारला. या घरामध्ये इरशाद तोहीत मुली (४०), रेश्मा इरशाद तोहीत मुल्ली (२२), जुनुअल मालीक इस्लम (४८), पिंकी जुनुअल मालीक इस्लम (३६), कोकान मनीक शेख (३२), शोभाबेगम कोकान मनीक शेख (३०), अनिकुल आलम समसुल आलम (३४), कविता खातुन जियाजु शेख (२८) हे बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळले.

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन मूळ गावाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदा भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानुसार, या सर्वांविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९५० तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आल्याची माहिती वपोनि अतुल आहेर यांनी दिली.

Pune Crime: पुणेकरांना IPL चं असंही फिव्हर, फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकताच चक्रावले…
गेल्या आठवड्यातच, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आसुडगाव सेक्टर-४ भागात बेकायदा वास्तव्यास असलेले आठ पुरुष व पाच महिला अशा एकूण १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed