कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते.
तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढतच राहतात. हे ओळखून पोलिस निरीक्षक यादव यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले. तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी बरेच मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.