यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शिंदे-फडणवीस सरकार हे धोक्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर उरलेले आमदारही अपात्र ठरतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर शिंदे गट संपेल. या निकालानंतर कोण कुठे जातंय, कोण पाताळात गाडलं जातंय, हे दिसेलच. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला तेव्हा नरहरी झिरवळ विधानसभा अध्य होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले तर तो निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडेच जाईल,असा दावा संजय राऊत यांनी केला.
जयंत पाटलांना ईडी नोटीस, राऊतांचा बोलण्यास नकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. त्यांना सोमवारी आयएलएफएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मध्यंतरी अजित पवार यांनी आमची बाजू मांडायला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते समर्थ आहेत, इतरांनी आमच्या पक्षाविषयी बोलू नये, असा टोला संजय राऊत यांना लगावला होता. त्यामुळे एरवी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाठराखण करणाऱ्या संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसवर बोलण्यास नकार दिला. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस बोलेल, त्यांच्याकडे वाघासारखे नेते आहेत, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.