शरद पवार हे देशात आणि राज्यात सन्मान असलेले नेते आहेत. देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांच्या कामाचा व्याप आहे. प्रकाशसिंग बादल यांच्या अंत्यसंस्कारावेळी गेलो होतो त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांनी पवार साहेबांनी केलेल्या कामाला विसरु शकत नाही, असं सांगितलं. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भावना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि माझ्याकडे व्यक्त केली, असं प्रफुल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे, अनेक नेत्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडू नये, अशी भावना बघायला मिळाली, अख्खा महाराष्ट्र आणि देशात जिथं जिथं पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथं त्यांच्या मनामध्ये दु:ख आहे, वेदना आहेत, या भावना नजरअंदाज होऊ शकत नाहीत, त्यामुळं आम्ही निर्णय मागं घेण्याची विनंती करणार असल्याचं पटेल म्हणाले.
शरद पवार यांनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतला होता. जी समिती बनवण्यात आली होती त्यात राज्याबाहेरचे नेते आहेत. त्यांना मुंबईत येण्यास वेळ लागणार होता त्यामुळं आज बैठक झाली, या समितीनं या बैठकीत एक ठराव मंजूर केला आहे. सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव शरद पवार यांना देणार आहे, असं पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. राजीनामा एकमतानं मंजूर करण्यात येत आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहावे हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, असं प्रफुल पटेल म्हणाले. शरद पवार यांनी आमच्या, देशातील जनतेच्या भावनेचा आदर करुन निर्णय घ्यावा, असं प्रफुल पटेल म्हणाले.
दरम्यान, समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. दुसरीकडे शरद पवार त्यांच्या निर्णयाबाबत काय भूमिका घेतात याचा सस्पेन्स कायम आहे.