उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे बुधवार आणि गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही शनिवारपर्यंत अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. नाशिक व्यतिरिक्त सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथेही बुधवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात या आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस आहे. परभणी, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारीही ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. विदर्भात अवकाळीची तीव्रता अधिक असून गारपीटीचीही वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही बुधवार आणि गुरुवारी गारपीटीची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या रांची ते मदुराईपर्यंत वारा खंडितता प्रणाली टिकून आहे. मान्सून पूर्व काळामध्ये जी सर्वसाधारण वारा खंडितता प्रणाली अपेक्षित असते, तशी यंदा ८ मार्चपासून आढळेली नाही. सर्वसाधारणपणे ही प्रणाली पूर्व किनारपट्टीला समांतर भूभागावर झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यंत असतो. यंदा ही प्रणाली दक्षिणोत्तर स्थितीत उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण चेन्नईपर्यंत दोलायनात फिरत राहिली. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्प भागात हवेचे उच्च दाब क्षेत्र समुद्रात दोन्ही बाजूला टिकून राहिले तर जमिनीवर वारा खंडितता प्रणाली यामुळे अवकाळी वातावरण सातत्यपूर्ण राहिले अशी माहिती खुळे यांनी दिली.