व्यवसायाने वकील असलेल्या शैला कंथे यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली असून या आठवड्यात किंवा २ मे रोजी याप्रश्नी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री, पालकमंत्री, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, आयएएस अधिकारी डॉ. योगेश म्हसे, कोकण विभागीय आयुक्त, कन्सेप्ट कम्युनिकेशनचे अध्यक्ष विवेक संचेती व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारविजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
‘सध्या करोनाचे संकट असतानाही आणि प्रचंड तापमान असूनही सरकारने भर उन्हात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. इतकेच नव्हे तर जवळपास दहा लाख अनुयायी जमले असूनही त्यांच्याकरिता पुरेसे पाणी, अन्न इत्यादीची सुविधाच दिली नाही. शिवाय १४ कोटी रुपये खर्चूनही मंडपही घालण्यात आला नाही. त्यामुळे १४ जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या सर्वांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
‘मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची भरपाई मिळावी’
‘प्रत्येक मृताच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची भरपाई व जखमींना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. तसेच याचिका निकाली निघेपर्यंत हीच अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.