कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टप्प्यातील जवळपास ९८.२ टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अतुल शिवनिवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे. त्यामुळे आता या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सगळ्यात पहिला टोल नाका राजापूर हातिवली येथे सुरू होणार आहे.
यापूर्वी २२ डिसेंबरला हा टोल नका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती. अनेक विषय बाकी आहेत, या टोल नाक्यापासून सहाशे मीटर अंतरावर काम सुरू आहे पाणी योजना विषय आहे. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू होणार नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरू का? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल वसूलीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने हातीविले टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
