• Tue. Sep 15th, 2026

Manoj Jarange : शांततेत आंदोलन करु असा अमृताताईंना माझा शब्द, मनोज जरांगे यांचं मिसेस मुख्यमंत्र्यांना आश्वासन

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मुंबईत येऊन शांततेत आंदोलन करु, असा शब्द देत असल्याचं म्हटलं आहे. जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मराठा नेत मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, मनोज जरांगे हे माझे भाऊ असून त्यांना मी घरी जेवणाचे निमंत्रण देते, असं म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी यानंतर अमृता फडणवीस यांच्या जेवणाचे निमंत्रण स्वीकारल्याचे म्हटलं होतं. भाऊ आता आरक्षणाची लढाई लढत असताना बहिणीकडे कसा जाणार? मात्र भाऊबीजेला नक्की जाणार असल्याचं म्हटलं होतं. मनोज जरांगे यांच्या या भूमिकेनंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली होती. “सध्या सणाचे दिवस असल्याने मला विश्वास आहे की, माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अमृता ताईंकडून आम्हाला दयेची अपेक्षा आहे. आजही ताईंना शब्द आहे, मी शांततेतच आंदोलन करणार. त्यांचं एक जेवण्याचं वाक्य आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यांनी स्वच्छ मनाने सांगितलेलं आहे. भाऊबीजेचं निमंत्रण आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यांच्या वाक्यात खुन्नस नाही. टोचून त्या बोललेल्या नाहीत. ताईंना शांततेत आंदोलन करू, असा आमचा शब्द आहे. त्या चांगल्या बोललेल्या असताना आम्ही वाईट बोलणार नाहीत. आमच्यावर देखील चांगले संस्कार आहेत, वाईट नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम

“न्यायदेवतेचा सगळा सन्मान करून मी मुंबईत उपोषणाला बसणार. मी कायद्याला मानतो. आपण अर्ज केलेला आहे. परवानगी द्यायची की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. ते कायद्याला न्यायदेवतेला मानत असतील तर परवानगी देतील. मी कायद्याचं उल्लंघन केलं आहे का? तुम्ही परवानगी दिली नाही याचा अर्थ तुम्ही न्यायदेवतेला मानत नाहीत. हे वाट बघतात मग परवानगी देतात. परवानगी द्यायला उशीर का? आम्ही मुंबईच्या पायथ्याला जाऊन थांबणार”, असं जरांगे म्हणाले.

“एक वेळ वाशीवरून परत येऊन आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. मराठ्यांचे प्रश्न निकाली लागले आणि माझे तसेच फडणवीस यांचे संबंध चांगले झाले तर शिंदे सेनेचं काय होणार? मग तुमचा बाजार उठेल. शिंदे आणि माझे संबंध चांगले झाले तर मग तुझं कसं होणार?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारची बाजू घेणाऱ्या मराठा नेत्यांना केला आहे.

“उपोषण कायम सुरु राहणार. मुंबईत देखील उपोषण कायम ठेवूनच जाणार. मला मरण आलं तरी घेणार. मी समाजासाठी फक्त जीव देऊ शकतो. प्रामाणिकपणा शेवटपर्यत कायम ठेवणार आहे. मरताना शेवटचा शब्द मराठ्याच्या लेकरांचं कल्याण करा हा शब्द बोलूनच मी जीव सोडीन”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

मनोज जरांगे यांचं विखे पाटील यांना प्रत्युत्तर

“तुम्हाला 3 वर्ष वेळ दिलं आहे. तुम्ही समाजाचं खूप नुकसान केलं. आम्ही तुम्हाला या म्हणून कधीही म्हणालो नाहीत. आता तुमहाला मराठे मतदान करणार नाहीत असं म्हटलो तर कसं होईल? आमच्या भावनेची कदर करून काही फायदा नाही. तुम्ही सातारा संस्थानसाठी 1 वर्ष वेळ मागितला. आम्ही दिला. पण तुम्ही लागू केलं नाही”, असं जरांगे म्हणाले.

“MPSC विद्यार्थींचे प्रश्न सोडवले नाहीत. तुम्ही जीआर लागू केले नाहीत. तुम्ही केसेस मागे घेतल्या नाहीत. एक वर्ष संधी देऊनही तुम्ही काहीही केलेलं नाही. 9 सप्टेंबरला तुम्ही जसा जीआर काढला तसा मराठा समाजासाठी काढा. मराठवाड्यातील सर्व मराठा हा कुणबी आहे, असा जीआर काढा. 9 सप्टेंबर रोजी तुम्ही वैश्यवाणी समाजासाठी काढला आहे तसा आमच्यासाठी काढा”, अशी मागणी जरांगे यांनी केली.

जरांगेंची मुंबई पोलिसांच्या परवानगीवर प्रतिक्रिया

“सण उत्सवच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्माण झालेले आहेत. लोकमान्य टिळकांचा अवमान तुम्ही करू नका. आम्ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी येत आहोत. सगळे मराठे दर्शनाला आल्यानंतर गर्दी होणार नाही का? सणाच्या नावाखाली अन्याय करू नका. सणच आमचा आहे. गेल्यावर्षीही गणेशोत्सव होता. जाळपोळ दंगली झाल्या का? आमच्या पोरांनी मुंबईत फक्त देखावे केले. परंपरा दाखवत होते. पोलीस दुजाभाव करू शकत नाही. काहीही बतावण्या करू नका”, असं जरांगे म्हणाले.

“जर तरला काही अर्थ नाही. त्याचं काही विचारू नका. वर्षभर वेळ देऊनही त्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे मुंबईत नाही तर मग कुठे आंदोलन करणार? सरकारच्या शब्दावर भळभळणारा मी नाही. मी कणखर आहे. लढणारा जरी मेला तरी जास्त द्वेषाने लढा. पळू नका. कोंडाणा किल्ल्याची आठवण समोर ठेवा. लढणारा मेला तर पळू नका. पळण्याचा इतिहास पुसून लढण्याचा इतिहास निर्माण करा. लढणारा मेला तर जास्त लोक पेटतात. असा इतिहास तयार करा. सरकारचा भ्रम दूर करा. ज्यांना मुंबईत यायचं नाही त्यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर यावे आणि शांततेत आंदोलन करायचे”,असं आवाहन जरांगे यांनी केलं.