Maharashtra Rain News : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सोमवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कुठे किती पावसाची नोंद?
मुंबईमध्येरविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ७८.७ तर, कुलाबा येथे ४०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू येथे ४५.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. शनिवारी रात्रीपासून सकाळी १०पर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार वांद्रे कुर्ला संकुल अग्निशमन दल केंद्र येथे १४७.६ मिलीमीटर, बोरिवली अग्निशमन दल केंद्र येथे १३८ मिलीमीटर, आर मध्य महापालिका कार्यालय येथे १३५ मिलीमीटर, एम पश्चिम महापालिका कार्यालय येथे १३५.६ मिलीमीटर, चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी येथे १३२.८ मिलीमीटर, गोवंडी येथील शिवाजीनगर महापालिका शाळा येथे १२१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरामध्ये एफ दक्षिण विभाग येथे १०६.२, जी उत्तर येथे १०३.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.
FDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचना
प्रादेशिक हवामान विभागाकडून काय सांगण्यात आलं?
सकाळी १० पर्यंत पावसाचा तडाखा बसून, सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई तसेच ठाणे, पालघर येथे ऑरेंज ॲलर्ट जारी केला. हा इशारा सोमवार सकाळी ८.३० पर्यंत कायम असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाब्यात ३० मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ७९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वातावरणात भक्तिरंगाची उधळण
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीची लगबग सुरू असतानाच रविवारी मुंबई, महामुंबई परिसरातील आकाशात कृष्णमेघांनी गर्दी केली आणि विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी निसर्गानेच जणू मंगलाभिषेक सुरू केला. गणरायाच्या आगमनाला अवघे २४ तास उरले असताना बरसलेल्या या सुखसरींनी वातावरणात भक्तिरंगाची उधळण केल्याने गेल्या काही दिवसांपासून दाटलेली पाऊसचिंता थोड्या प्रमाणात का होईना दूर तर झालीच शिवाय गणरायाच्या स्वागताचा उत्साहसुद्धा द्विगुणित झाला.
Ganeshotsav 2026: यावे बाप्पा, स्वागत असो! श्रीगणेशाची आज जल्लोषात प्रतिष्ठापना; यंदा गणरायाचा बारा दिवस मुक्काम
पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही
गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघी मुंबई सज्ज होत असताना रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. मात्र, त्याचा भक्तांच्या खरेदी उत्साहावर तसूभरही परिणाम जाणवला नाही. छत्र्या आणि रेनकोटच्या आडून मुंबईकरांनी बाजारपेठ गाठत गणेशोत्सवासाठीची शेवटच्या टप्प्यातील खरेदी उरकली. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. घरातील गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, तोरणे, विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठीच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी
‘पाऊस कितीही असला तरी गणेशोत्सवाची तयारी थांबवता येत नाही. यंदा घरची आरास थोडी वेगळी करायची आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी सुरू आहे’, असे स्वप्नील पिकुळकर यांनी सांगितले. काही ठिकाणी दुकानदारांनी साहित्य भिजू नये म्हणून दुकानांसमोर प्लास्टिकचे आच्छादन केले होते. सजावटीच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात होती.
Crime News : व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉलमधून धमकी, मुंबईच्या गुन्हे शाखेने एकाला उचललं, पोलिसांना पाकिस्तान कनेक्शनचा संशय
विविध आकर्षक पर्याय उपलब्ध
गणेशोत्सवासाठी घराची सजावट करण्यासाठी यंदा पारंपरिक वस्तूंसोबत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी खरेदी करणाऱ्यांनाही आपल्या पसंतीनुसार साहित्य निवडता येत आहे. फुलांची सजावट, आरास, तोरणे आणि रोषणाईच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ‘पावसामुळे खरेदीवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, सकाळपासून ग्राहक येत आहेत. विशेषतः पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी शेवटच्या क्षणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे,’ असे संदीप शिंदे या अंधेरीतील विक्रेत्याने सांगितले.
