• Thu. Sep 10th, 2026

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. राज्यातील वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी केंद्रीकृत यंत्रणा उभारून अतिरिक्त पथके तसेच स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याबाबत बैठक झाली. यावेळी आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसद, आमदार गजानन लवटे, उमेश यावलकर, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अमरावती वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाने अतिरिक्त मनुष्यबळासह २४ तास कार्यरत ‘स्मार्ट स्क्वाड’ तयार करावे. नागरिकांकडून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या वावराची माहिती प्राप्त होताच वन विभागाची यंत्रणा तातडीने सतर्क होऊन घटनास्थळी पोहोचली पाहिजे. यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष आणि तात्काळ माहिती पोहोचविणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

बिबट्या अथवा वाघाच्या बचावासाठी आवश्यक असलेले पिंजरे, मनुष्यबळ आणि इतर साधने युद्धपातळीवर उपलब्ध करून द्यावीत. संभाव्य घटना घडण्यापूर्वीच वन्यप्राण्यांचा बचाव व सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी. वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर विलंब न करता संबंधित पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिकांच्या जीवितहानीनंतर मदत देण्यापेक्षा दुर्घटना रोखणे अधिक महत्त्वाचे आहे. भविष्यात अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाने आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. या कार्यवाहीसाठी शासन वन विभागाच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहे, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

रेस्क्यू व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बाधित परिसरात तातडीने पथक पाठवून परिस्थितीचा आढावा घ्यावा. सध्या इतर प्रक्रियांपेक्षा वन्यप्राण्यांचा बचाव आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळालेल्या परिसरात तातडीने रेस्क्यू पथक पाठवावे. संपूर्ण कारवाईदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत नागरिकांवर हल्ला होणार नाही, यासाठी यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

वडाडा येथील रेस्क्यू सेंटर तातडीने सक्रिय करावे.   वन्यप्राणी रेस्क्यू मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ किंवा सुरक्षा व्यवस्थेत कमतरता राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

रेस्क्यू मोहिमेदरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करावा. जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य वनसंरक्षक यांनी संयुक्तपणे नुकसानीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे तातडीने पाठवावा. रेस्क्यूदरम्यान झालेल्या नुकसानीची क्षेत्रनिहाय व हेक्टरनिहाय माहिती प्रस्तावासोबत सादर करावी, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षितता, वन्यप्राण्यांचा तातडीने बचाव आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई या तिन्ही बाबींना प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

 

0000

गजानन पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed