• Sun. Sep 6th, 2026

Manoj Jarange Patil: शरद पवारांनी आणि मविआने मराठ्यांसाठी काय केलं? विखेंचा सवाल, जरांगेंनी रोखठोक भूमिका मांडत पुन्हा केली कोंडी

योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या शब्दानंतर त्यांनी पाणी, औषधोपचार आणि सलाईन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा पाणी आणि औषधोपचार घेणे बंद केले आहे.

दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची तब्बल 3 तास चर्चा झाली. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीआधी मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या मळ्यात तब्बल पाच ते सहा तास चर्चा झाली. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार प्रयत्नशील असल्याचा शब्द शिष्टमंडळाने दिल्यानंतर जरांगे यांनी पाणी प्यायले, तसेच औषधोपचार घेण्यास सुरुवात केली. मात्र, आज या आश्वासनाला तिसरा दिवस उलटूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

शरद पवारांबद्दल काय म्हणाले जरांगे?

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी, शरद पवारांनी काय केलं? महाविकास आघाडीने काय केलं? असा सवाल उपस्थित केल्याचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मग फडणवीसांनी व भाजप सरकारने तरी काय केलं? जे प्रमाणपत्र तुम्ही दिले होते ते रद्द ही तुम्हीच केले. आधीच्या सरकारमधील नेत्यांनी काही केलं नाही म्हणूनच मराठा समाजाने तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. तुमचे आमदार आणि खासदार सत्तेच्या गादीवर मराठ्यांनी पाठवले. मराठ्यांचं भलं करण्यासाठीच आम्ही तुम्हाला सत्ता दिली. मग आता तुम्ही आम्हालाच विचारता की महाविकास आघाडीने काय केलं आणि शरद पवारांनी काय केलं?” असा सवाल जरांगे यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी सरकारवर आणखी गंभीर आरोप केले. तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आणि तुम्हीच प्रमाणपत्र रद्द केलं. हे आता मराठ्यांना कळायला लागलं आहे, असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर अद्याप शासन निर्णय झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

“मराठ्यांच्या पोरांना हात लावून दाखवा, ताकद दाखवतो”

सरकारला इशारा देताना जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला. मी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलो आहे. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र सरकारच्या डोक्यात जर वेगळं काही चाललं असेल, तर माझा इशारा आहे. मागच्या वेळेस केलं तसं आता करू नका. या वेळेस माझ्या मराठ्यांच्या पोरांना किंवा कुणालाही काठी लावून दाखवा, मग तुम्हाला मराठ्यांची ताकद दाखवतो, असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, तुमच्या म्हणण्यानुसार मी औषधं, सलाईन आणि पाणी घेतलं. विखे पाटील, तुम्ही दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता. त्यामुळेच रात्री 11 वाजल्यापासून मी पुन्हा औषधोपचार आणि पाणी घेणं बंद केलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता सरकारने विलंब न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आठव्या दिवशीही अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा तणाव कायम असून सरकारसमोरील पेच आणखी वाढला आहे.