• Wed. Sep 2nd, 2026

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 17, 2026
क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. १७: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल बी. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, आयसर, सी-डॅक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात प्रवेश होत आहे. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे.

राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद

ते म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून, प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील काही वर्षांत रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांमध्ये क्वांटम क्षेत्रातील क्षमता विकसित होत असून, या सर्व संस्थांची ताकद एकत्रित करून राज्याचे क्वांटम मिशन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम, एलएमएस आणि ‘चंद्र’ व ‘सूर्य’ हे चॅटबॉट्स विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात उपयुक्त ठरत असल्याचे नमूद करून या उपक्रमात सहभागी सर्व संस्था, तज्ज्ञ आणि प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed