• Wed. Sep 2nd, 2026

Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर बुधवारी (2 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. ज्येष्ठ वकील नीरश किशन कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना पक्षात नेमकं बंड का झालं? याबद्दल सविस्तर घटनाक्रम सांगितला. तसेच 2018 च्या पक्षाच्या घटनेबाबतही वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. 2018 ची घटना ही लोकशाहीवादी नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षात एकाधिकारशाही होती, असा आरोप शिंदेंच्या वकिलांनी केला.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे देखील आज दिल्लीला आहेत. एकनाथ शिंदे यांच्या काही महत्त्वाच्या बैठका दिल्लीत होत्या. तसेच सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांसोबत चर्चा करण्यासाठीदेखील आपण दिल्लीत आल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सुनावणी पार पडल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम सुरु झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घटना आणि विचार नंतर कसे पायदळी तुडवले हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांची घटना आणि विचार सगळंच बदललं. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये त्यांनी बहुमत गमावलं. बाळासाहेबांचे विचार गोठवलं, जनतेचं बहुमत गोठवलं, हिंदुत्व गोठवलं, आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जो निर्णय घेतला तो सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या सर्वांच्या पाठिशी आहे. जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे, आशीर्वाद दिला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्हीच खरी शिवसेना, शिंदेंचा दावा

“खरी शिवसेना आम्हीच आहोत. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलोय का? शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला आहे. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही बहुमताने शिवसेना पक्षात राहिलो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बदलले त्यांनी दुसरा निर्णय घेतला. हा सर्व न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे या विषयावर स्पष्टीकरण आणि विस्तीर्णपणे बोलू शकत नाही”, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

‘लोकशाहीत बहुमत हेच महत्त्वाचं’, शिंदेंची प्रतिक्रिया

“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. पक्ष संघटनेच्या पदांसाठी निवडणुका वगैरे काही नाही तर नियुक्त्या होऊ लागल्या. मनमानी होऊ लागली. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, माझी शिवसेना विचारधारेपासून दूर होऊ शकत नाही. माझी काँग्रेस होऊ शकत नाही. अन्यथा मी दुकान बंद करेन. पण त्याउलट विपरित जे काही घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे लोकशाही मानणारे, बाळासाहेबांचे विचार मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे लोकशाहीत बहुमत हेच महत्त्वाचं असतं”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिंदेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

शिंदेंच्या वकिलांना 2018 ची पक्षाची घटना ही लोकशाहीवादी नव्हती, असं म्हटलं. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढवली. पण निकालांनंतर ज्यांच्याविरोधात निवडणूक लढली त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. यामुळे पक्षात मतभेद झाले. यातून पक्षात उठाव झाला, असा युक्तिवाद शिंदेंचे वकील कौल यांनी केला. यावेळी कौल यांनी पक्षात एकाधिकारशाही असल्याचा आरोप केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली 1999 ची घटना का बदलली गेली? बाळासाहेबांच्या काळात निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. पण नंतर पक्षात संघटनात्मक पदांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केलं. पण उद्धव ठाकरेंनी केले नाही, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.