• Wed. Jun 24th, 2026

    वि‍जांच्या कडकडाटासह पावसाची दमदार एन्ट्री, आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईकर सुखावले; 48 तासांसाठी शहरात ‘यलो अलर्ट’

    वि‍जांच्या कडकडाटासह पावसाची दमदार एन्ट्री, आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईकर सुखावले; 48 तासांसाठी शहरात ‘यलो अलर्ट’

    IMD Monsoon Update: पूर्वमोसमी पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी सकाळीच हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांच्या आठवड्याची सुरूवात दिलासादायक झाली. आता येत्या दोन-तीन दिवसांत शहरात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: सोमवारी सकाळीच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांच्या आठवड्याची सुरूवात सुखकर झाली आहे. रविवारी सकाळीही काही काळ पूर्व-मोसमी पावसाने हजेरी लावली होती. पण त्यानंतर दिवसभर वातावरणात उकाडा कायम होता. पण सोमवारी सकाळी मेघगर्जेसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

    रविवराही पावसाचं आगमन

    जून महिन्याचे तीन आठवडे संपले तरी कडक ऊन, वाढता उष्मा व पावसाचा लवलेश नसल्याने आकाशातील पांढरे ढग पाहून त्रस्त झालेल्या मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना रविवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी व शिडकाव्याने काहीसा दिलासा दिला. मुंबईतील अनेक भागांसह ठाणे, अंबरनाथ, नवी मुंबई, बदलापूर, मुरबाड परिसरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पावसाचं दर्शन झाल्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. त्यात ठाणे, नवी मुंबईसह अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवली असून या पावसामुळे नागरिकांना आशा मिळाली आहे.

    हवामान विभागाचा अंदाज काय ?

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा वेग पुन्हा हळूहळू वाढत असून 24 जूनपर्यंत मुंबई-पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार 22 -23 जून रोजी मुंबईसह उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट दिला होता. पण यापूर्वी दिलेल्या अनेक तारखांना पाऊस आलाच नसल्यामुळे मुंबईकरांच्या पदरी यंदाही निराशाच पडेल का अशी भीती व्यक्त केली जात होती. पण पूर्व-मोसमी पावसाच्या हजेरीमुळे मान्सून लवकरच शहरात धडकणार हे स्पष्ट झालं आहे.

    सोमवारी सकाळी 6.30च्या सुमारास पश्चिम उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली. गोरेगाव, वांद्रे, नवी मुंबईमध्ये काही काळासाठी मुसळधार पाऊस सुरू होता. या सरींमुळे सकाळच्या वातावरणात गारवा पसरला असून मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप हवामान विभागाने मुंबईत मान्सून दाखल झाला याची घोषणा केली नसली तरी येत्या काही दिवसांत मान्सूनच्या आगमनाची दाट शक्यता आहे.

    कोणत्या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ?

    24 जूनपदरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली असून मान्सूनच्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

    येत्या 48 तासांत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोसमी वाऱ्यांना वेग मिळणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा