• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai Monorail: आठ महिन्यांनंतर पुन्हा धावणार ‘मोनोरेल’; या आठवड्यात अंतिम चाचणी, कधी सुरू होणार सेवा?

    MMRDA Monorail: मोनोरेलच्या नवीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून योग्य चाचण्या पार पडल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. दररोज हजोर प्रवाशांना मोनोरेलमुळे फायदा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: तांत्रिक बिघाड, अपघात, वारंवार होणारा सेवेचा खोळंबा आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे तब्बल आठ महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मुंबईची मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर २०२५पासून बंद असलेल्या मोनोरेलच्या अंतिम सुरक्षा तपासण्या आणि चाचणी फेऱ्या या आठवड्यात सुरू होत असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास जूनमध्ये सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

    चाचणी फेऱ्यांना सुरुवात

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिपत्याखालील महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल)कडून मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम सुरक्षा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांच्या देखरेखीखाली ही तपासणी सुरू असून पुढील काही दिवस चाचणी फेऱ्या घेऊन सर्व तांत्रिक पडताळणी केली जाणार आहे.

    Maharashtra TimesKonkan Railwayवरील गाड्यांच्या वेळा बदलणार; मान्सून वेळापत्रक जाहीर, मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक एक्सप्रेसवर परिणाम

    अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बघेल यांनी सुचवलेल्या सर्व सुरक्षाविषयक मुद्द्यांची पडताळणी केली जात आहे. आठवडाभर सुरू राहणाऱ्या या तपासणीनंतर निरीक्षणे नोंदवून आवश्यक अटींसह मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जूनमध्ये प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    सखोल पाहणी

    यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ‘ब्युरो व्हेरिटास इंडिया’ने १९.५४ किमी लांबीच्या संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल)-चेंबूर मोनोरेल मार्गाला प्रमाणपत्र दिले होते. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या गंभीर तांत्रिक घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई मोनोरेलच्या इतिहासात प्रथमच निवृत्त सुरक्षा आयुक्तांकडून स्वतंत्र तपासणी केली जात आहे. या तपासणीत मोनोरेलच्या गाड्या, सिग्नल यंत्रणा, दूरसंचार व्यवस्था आणि स्वयंचलित तिकीट प्रणालीचीही सखोल पाहणी होणार आहे.

    सन २०१४मध्ये मोठ्या अपेक्षांसह सुरू झालेल्या मोनोरेलला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. २०२५च्या पावसाळ्यात वारंवार सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वडाळा डेपोबाहेर चाचणीदरम्यान नवीन मोनोरेल रेक रुळावरून घसरल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. बंद होण्यापूर्वी दररोज सुमारे १८ ते २० हजार प्रवासी मोनोरेलचा वापर करत होते.

    Maharashtra TimesBullet Train: पारसिक डोंगराखाली बुलेट ट्रेनचा बोगदा; कटरहेड घणसोली शाफ्टमध्ये दाखल, ‘अंडरग्राऊंड टनल’चा मार्ग कसा असेल ?

    मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल), भायखळा, चिंचपोकळी, वडाळा, अँटॉप हिल, जीटीबी नगर, चेंबूर आणि टिळकनगर परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा