Mumbai Dam Water Level: कमी पावसाचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली दहा टक्के पाणीकपात आणि राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीनंतरही मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
मुंबईला मोडक सागर , तानसा, मध्य वैतरणा , विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची पाणीसाठवणक्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यातून दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या सातही धरणांत एकूण दोन लाख ६३ हजार ३३७ दशलक्ष लिटर म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी सातही धरणे मिळून याच तारखेला १६ टक्के तर, सन २०२४ मध्ये १० टक्के पाणीसाठा होता.
दादरमधील डॉक्टर ब्रिटनमध्ये महापौर; डॉ. नितीश राऊत यांच्याकडे ‘सटन कोल्डफिल्ड’ची धुरा
या धरणांपैकी मोठे धरण असलेल्या अप्पर वैतरणा धरणाचे पाणी पाच टक्क्यांपर्यंत घसरले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ टक्के पाणीसाठा होता. सात धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा धरण ही दोन्ही धरणे राज्य सरकारच्या अखत्यारित असून उर्वरित पाच धरणे मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहेत. अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांतील अनुक्रमे ९० हजार दशलक्ष लिटर आणि एक लाख ४७ हजार ९२ दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. मात्र सातही धरणांतील पाणीसाठा दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतरच या राखीव पाणीसाठ्याचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘भारत याचक म्हणून गेला नाही’; Devendra Fadnavis यांनी सांगितली आंतरराष्ट्रीय घडामोडींची इनसाईड स्टोरी
महापालिकेच्या आवाहनाला तिलांजली
यंदा १५ नेपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून मुंबईकरांना पार्ण जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र या आवाहनानंतरही मुंबईकरांनी या आवाहनाला तिलांजलीच देत असल्याचे दिसते आहे. वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. हॉटेलांमध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेवढेच पेल्यांमध्ये पाणी द्यावे, अथवा पाण्याची बाटली पुरवावी, जेणेकरून अकारण पाग्याने भरून ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तरीही याकडे हॉटेलमालक आणि ग्राहक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
उर्वरित सहा धरणांतील शिल्लक पाणीसाठा
मोडक सागर – ३४ टक्के
तानसा – १३ टक्के
मध्य वैतरणा – २४ टक्के
भातसा -१७ टक्के
विहार -४८ टक्के
तुळशी -२९ टक्के
