• Sat. Jun 6th, 2026
    तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?

    Weather Update: राज्यात सध्या उत्तरेकडील राज्यांकडून उष्ण वारे येत असल्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्याची तीव्रताही अधिक जाणवत असून तापमानाने उच्चांक गाठला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/ पुणे: मुंबईमध्ये या आठवड्याची सुरुवातही कमालीच्या उकाड्याने झाली. मुंबईत सोमवारी तुरळक ठिकाणी उष्मा जाणवेल, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला होता. मात्र सोमवारी तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचल्याची नोंद झाली. आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा मुंबईकरांना झालेली तापमानाची जाणीव अधिक होती. सोमवारच्या पूर्वानुमानानुसार, मंगळवारपासून चार दिवस कोकण विभागासाठी उष्णतेचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

    सोमवारी मुंबईतील तापमान

    मुंबईच्या विविध केंद्रांवरील नोंदीनुसार राम मंदिर येथे सोमवारी ३९.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. विक्रोळी येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वांद्रे येथे ३७.३, दहिसर येथे ३७.१ तर विद्याविहार येथे ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवरील कमाल तापमानापेक्षा अधिक होते. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी अनुक्रमे ३५.८ आणि ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.Maharashtra TimesMumbai News: मुंबईतील पहिल्या भुयारी बोगद्याचं खोदकाम वेगात; 250 मीटर काम पूर्ण; मध्य-पश्चिम रेल्वे आणि मेट्रोखालून मार्ग

    सांताक्रूझ येथे २.२ तर कुलाबा येथे १.५ अंशांनी सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक होते. सोमवारी वातावरणातील आर्द्रता वाढल्याने किमान तापमानही चढे होते. सांताक्रूझ येथे २८ तर कुलाबा येथे २७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे मुंबईकरांना सध्या रात्रीच्या वेळीही अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळे रात्रीची झोपही निवांत होत नसल्याचे मुंबईकरांचे निरीक्षण आहे. दुपारच्या वेळी काही वेळ वाऱ्याची झुळूक जाणवली, मात्र ही झुळूकही उष्म्याचीच जाणीव करून देत होती. अलिबाग येथे सोमवारी ३८.२ तर डहाणू येथे ३७.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान भारतीय हवामान विभागाकडून नोंदले गेले.

    उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट

    प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार १२ मे ते १५ मे या दरम्यान कोकणामध्ये वातावरण कोरडे असेल, तर उष्णतेचा इशारा सध्या तरी नाही. मात्र धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जिल्ह्याचा घाट परिसर येथे मंगळवारी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते. याचा परिणाम उत्तर कोकणातील काही भागांवर होऊ शकतो.

    पुण्यात तापमानाने उच्चांक गाठला

    पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल ४१.६ आणि किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दहा वर्षांतील मे महिन्यात नोंदवले गेलेले हे उच्चांकी तापमान ठरले आहे. वाढलेल्या किमान तापमानानेही या हंगामाचा विक्रम मोडला आहे.

    पुण्यातील तापमान

    मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने पुणेकरांना आता पूर्वमोसमी पावसाचे वेध लागले असताना, शहरात सध्या उष्णतेच्या लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात तीन दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात येते आहे. गेल्या आठवड्यात सकाळी ऊन आणि दुपारी आकाश ढगाळ होते; त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने दिवसा आणि रात्रीचा उकाडा वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सरासरीपेक्षा तापमान वाढल्याचे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे.
    सोमवारीदेखील सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती.

    Maharashtra TimesMumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग! उत्तर मुंबईतील प्रवाशांना फायदा होणार; 10 टप्प्यांत कसा बांधणार मार्ग?

    चार दिवस पावसाची शक्यता नाही

    दुपारी रस्त्यावर उन्हाचे चटके आणि उष्णतेचा दाह जाणवला. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्येही हेच चित्र होते. सूर्यास्तानंतरही गरम हवा होती. रात्रीही उकाडा वाढत गेल्याने नागरिक वैतागले होते. पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही, त्यामुळे वाढलेल्या उन्हाची दखल घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ‘आयएमडी’ने केले आहे.

    “राज्यात सध्या उत्तरेकरील राज्यांकडून उष्ण वारे येतआहेत. हवेतील आर्द्रताही कमी झाली आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्याची तीव्रता अधिक जाणवते आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ झाली आहे, पुढील दोन दिवस हेच वातावरण कायम राहील,” असे आयएमडीचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांचे मत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा