• Sat. Jun 6th, 2026

    वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?

    वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?

    Mumbai Coastal Road: समुद्रात 120 मीटर अंतरावर असलेली वरळी जेट्टीचं रुपांतर आता आपत्कालीन वापरासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी हेलिपॅडमध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्गाचा वापर मल्टीमॉडल वाहतुकीसाठी केला जाईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी: मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतचा विस्तार झालेला मुंबई सागरी किनारा मार्ग वाहनचालकांच्या सेवेत आल्यानंतर आता येथील विद्यमान जेट्टीचा वापर बहुआयामी वाहतूक (मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट) म्हणून केला जाणार आहे. यासाठी लहान आकाराच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि उतरण्यासाठी हेलिपॅड बांधले जाणार असून याचे काम रेमंड कंपनीला देण्यात आले आहे. या प्रस्तावाला आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली. लवकरच याचे काम सुरू होणार असून महापालिकेला महिन्याला चार लाख रुपये शुल्क मिळणार आहे.

    कोणाला होणार फायदा?

    मार्च २०२४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा आढावा घेऊन विविध निर्देश दिले होते. यामध्ये सागरी किनारा मार्गावर हेलिपॅड उभारण्याचा विचार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली होती. यानंतर महापालिकेने मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्टसाठी चाचपणी करताना सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सल्लागाराची नियुक्ती करून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला. सागरी किनाऱ्यावरील वरळी जेट्टीवरच हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत मंत्रालय, विविध मंत्र्यांचे सरकारी बंगलेही आहेत. तसेच बडे उद्योगपतीही राहतात. त्यामुळे भविष्यात हेलिपॅड झाल्यास त्याचा फायदा होणार असल्याने हालचाली झाल्या.Maharashtra TimesMumbai-Pune Expressway’s Missing Link: 10 दिवसांत एक्स्प्रेस वेचं चित्र बदललं; 70 टक्के वाहनांची वाहतूक ‘कनेक्टिंग लिंक’वर वळवली, अपघात, कोंडीतून सुटका

    महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेऊन यासंदर्भात महापालिकेने चर्चा केली होती. त्या चर्चेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाने आयआयटीकडून जेट्टीच्या संरचनात्मक स्थिरतेचा अहवाल मागविण्यात आला. अहवालानुसार वरळी येथील जेट्टी संरचनात्मकदृष्ट्या स्थिर असून तिचा वापर बहुआयामी वाहतुकीसाठी करता येऊ शकतो, असे स्पष्ट केले. बहुआयामी वाहतुकीसाठी वापर करताना हेलिपॅडची उभारणी करण्याची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. हेलिपॅडची उभारणी व्यवहार्य असल्याचा निर्वाळा महापालिकेने नियुक्त केलेल्या ‘पवनहंस लिमिटेड’कडून देण्यात आला. ‘पवनहंस लिमिटेड’ ही नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत संस्था असून हेलिपोर्ट्स आणि हेलिपॅडच्या विकासातील तज्ज्ञ संस्था आहे. त्यांच्याकडूनच हेलिपॅड उभारणी केली जाणार होती. मात्र त्यांनी माघार घेतली आणि महापालिकेने याबाबत निविदा मागवली.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?

    महापालिकेला महिन्याला चार लाख रुपये महसूल

    त्यामध्ये रेमंड कंपनीने रुची दाखवल्यानंतर त्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यातून महापालिकेला चांगला महसूलही मिळणार आहे. लहान आकाराच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि उतरण्यासाठी हे हेलिपॅड बांधले जाणार आहे. त्यातून महापालिकेला महिन्याला चार लाख रुपये कायमस्वरूपी महसूल मिळणार असून तसे करारात नमूद केले आहे. हेलिकॉप्टरच्या दिवसभरात फेऱ्या झाल्या किंवा नाही, तरीही चार लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारच असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय दिवसभरात हेलिकॉप्टरच्या जेवढ्या फेऱ्या होतील, त्यातील एकूण उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्नही महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे यामध्ये महापालिके नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा