बारामतीकरांनी पोटनिवडणुकीत भरघोस मतदान करून सुनेत्रा पवारांना आमदार केलं. सुनेत्रा पवारांचा विजय होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आणि अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांनी बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. सांगितल्याप्रमाणे जय पवारांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या. जनतेच्या अडचणी समजून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला. अजित पवारांप्रमाणेच जय पवारांचीही कामाची पद्धत आणि उरक यावेळी दिसून आला. बारामतीकरांनीही जय पवार यांच्यावर विश्वास दाखवत आपले प्रश्न मांडले. बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.