• Sun. Jun 7th, 2026

    Census In Maharashtra: आजपासून राज्यात जनगणना; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय

    Census In Maharashtra: आजपासून राज्यात जनगणना; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय

    Census In Maharashtra: स्व-गणना पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना ‘एसई’ क्रमांक दिला जाणार आहे. एकूण १६ भाषांमध्ये स्व-गणनेतील प्रश्न उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : सन २०११नंतर प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रीय जनगणनेला आज, शुक्रवारपासून राज्यात सुरुवात होत आहे. राज्यात दोन टप्प्यांत यंदाची जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी गुरुवारी दिली. आज, महाराष्ट्र दिनापासून सुरू होणाऱ्या या जनगणेनच्या पहिल्या टप्प्यात स्व-गणना केली जाणार असून, १ मे ते १५ मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

    १६ मे ते १४ जून या कालावधीत दुसऱ्या टप्प्यांतर्गत घर यादी आणि घरगणना पूर्ण केली जाणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने स्व-गणना करण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. याशिवाय पहिल्यांदाच जनगणना मोहिमेत जातनिहाय गणना आणि कुटुंबामध्ये प्रामुख्याने सेवन केल्या जाणाऱ्या धान्याची माहितीही गोळा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डांगे यांच्यासह ए. एन. राजीव, संतोष पायस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जनगणना विभागाकडून या प्रक्रियेबाबत सविस्तर सादरीकरणही करण्यात आले.

    Maharashtra TimesIPS Transfer : राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 21 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
    स्व-गणना प्रक्रियेची माहिती देताना निरुपमा डांगे म्हणाल्या, ‘पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्व-गणना करता येणार आहे. यासाठी https://se.census.gov.in हे स्वतंत्र पोर्टल १ मे ते १५ मे या कालावधीत कार्यरत राहील. शिवाय मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही स्व-गणना करता येणार आहे. घरातील कोणताही एक सदस्य सुमारे १५ ते २० मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करू शकतो. अर्ज सादर केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलवर स्व-गणना आयडी (SE-ID) प्राप्त होईल. स्व-गणना करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या स्व-गणनेत एकूण ३३ प्रश्नांची विचारणा करण्यात येणार आहे. त्यात घराची स्थिती, कुटुंब प्रमुख, नाव, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत, प्रकाशाचा मुख्य स्त्रोत, कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतरपैकी आहे का? यासारख्या प्रश्नांचा समावेश असेल.’ स्व-गणना प्रक्रिया ऐच्छिक असून ती बंधनकारक नसल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesSupriya Sule : ‘इथून पुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नाही’, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
    दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घरगणना
    या प्रक्रियेतील घर यादी आणि घरगणना मोहीम १६ मे ते १४ जून या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. या प्रक्रियेत जनगणना गणक घरी भेट देऊन स्व-गणनेतील संपूर्ण माहिती तपासून पडताळणी करतील. स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर जो ‘एसई’ क्रमांक दिला जाणार आहे, तो पडताणीदरम्यान दिल्यानंतर अवघ्या काही वेळात दिलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण पूर्ण केले जाणार आहे.

    २.६४ लाख क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
    घरगणना करण्यासाठी राज्यभरात सुमारे २.६४ लाख क्षेत्रीय अधिकारी म्हणजेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सर्व अधिकारी जणगणनेसाठी तैनात केले जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १४१ मास्टर प्रशिक्षकांना पुण्यातील ‘यशदा’मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यात जनगणना कार्य संचालनालयाच्या पाच राष्ट्रीय प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

    Maharashtra TimesVidhan Parishad Election : मला ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना… विधान परिषदेवर संधी न मिळाल्याने ट्रोल, भाजपच्या केशव उपाध्येंचं टीकाकारांना उत्तर
    जातनिहाय नोंदही केली जाणार
    यंदा पहिल्यादांच जातनिहाय नोंदही जनगणनेच्या प्रक्रियेदरम्यान केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याने त्याबाबत केंद्र सरकारने सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेत नेमके काय असणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय यंदा पहिल्यांदाच कुटुंबामध्ये प्रामुख्याने सेवन केल्या जाणाऱ्या धान्यांची नोंदही केली जाणार आहे. या संदर्भातील माहितीही दुसरा टप्पा सुरू होण्याच्या अगोदर जाहीर करण्यात येणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा