मुंबई, दि. २४ : राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
या विशेष मुलाखतीमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, लाभाचे स्वरूप, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कसा लाभ मिळणार आहे, याची सोप्या आणि सविस्तर शब्दांत माहिती दिली आहे. योजनेबाबत असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही या मुलाखतीतून मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या या निर्णयाची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होईल. या मुलाखतीचे निवेदन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
0000
जयश्री कोल्हे/ स.सं.
