Vidhan Parishad Election: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. शिवाय, राज्यसभा निवडणुकीत आघाडीने शरद पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने (शप) मित्रपक्षांना पाठिंबा देणे अपरिहार्य मानले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले असल्याने सर्वच पक्षांकडून विविध उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. या निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपने संख्याबळानुसार सहा जागांवर दावा सांगितला असून, यात राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून अनपेक्षित नावांची घोषणा करताना सर्व जातींमधील उमेदवारांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तसेच धक्कातंत्र या वेळीही विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल, याकडे लक्ष वेधले जात आहे.
Marathi Compulsion : मराठी सक्तीवरुन संघर्ष, चालक संघटनांची गोरेगावमध्ये बैठक, तर मंत्रालयातही हाय व्होल्टेज बैठक
दुसरीकडे, शिवसेनेचे विधानसभेतील ५७ संख्याबळ पाहता दोन जागा जिंकण्यात त्यांना कोणताही अडसर येणार नसल्याचे दिसते. राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी ज्येष्ठ नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आत्ताही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्कातंत्राचा अवलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, रवींद्र धंगेकर, डॉ. रोहित टिळक, राजू वाघमारे, शायना एनसी आदींच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यासाठी अमोल मिटकरी, आनंद परांजपे, समीर भुजबळ, सूरज चव्हाण, उमेश पाटील आणि अनिकेत तटकरे इच्छुक असल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीत एकमत न झाल्यास या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे राज्यातील शीर्षस्थ नेते प्रयत्नशील असून, तशा प्रकारच्या सूचनाही त्यांच्याकडून देण्यात येत असल्याचे समजते. मात्र, शिवसेनेच्या मुख्य नेत्याकडून नवव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते. त्यासाठी एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आला आहे, तर दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळीही खेळण्यात येणार असल्याचे समजते. अशात भाजप नेतृत्वाने नवव्या जागेसाठी उमेदवार उभा न करता ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आग्रह धरला, तरच ती बिनविरोध होईल असे सांगण्यात येते.
AAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला
‘मविआ’कडून उद्धव ठाकरे यांना आग्रह
महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. मात्र, ते निवडणूक लढवणार नसल्यास ही उमेदवारी आपल्याकडे कशी येईल, यासाठी पक्षाचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात चुरस असल्याचे समजते. असे असले तरी उद्धव निवडणुकीसाठी उत्सुक नसल्यास काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत.
