• Thu. Jun 18th, 2026
    Rohit Pawar : ‘शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला, अन्यथा…’; आमदार रोहित पवारांची मागणी

    Mla Rohit Pawar On Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते आणि रोहित पवारांच्या इशाऱ्याला काय उत्तर मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    रोहित पवारांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्रात बंदीची मागणी केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर: आपल्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. नागपूर येथील भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले. “युद्ध करताना महाराज थकले होते, त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती,” असा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्याच ठिकाणी हे वक्तव्य केल्याने आता संतापाची लाट उसळली आहे.

    “शिवरायांनी थकल्यामुळे…”

    धीरेंद्र शास्त्री यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगताना दावा केला की, “शिवरायांनी थकल्यामुळे राजपाट सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर रामदास स्वामींनी तो मुकूट पुन्हा महाराजांच्या डोक्यावर ठेवून, ‘हे राज्य माझे आहे आणि तुला फक्त त्याचे संचालन करायचे आहे’, असे सांगितले.” इतिहासाचा कोणताही आधार नसलेले हे विधान समोर आल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या बागेश्वर बाबांनी आता थेट शिवछत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे.

    रोहित पवारांची बंदीची मागणी

    या प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “शिवराय थकले होते, असे म्हणणारा हा भोंदू महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. “छत्रपतींचा अवमान होत असताना राज्यातील बडे नेते त्याच व्यासपीठावर असतानाही शांत कसे बसले?” असा सवाल करत, बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

    Maharashtra TimesAAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला

    रोहित पवारांचं ट्वीट जसंच्या तसं

    “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.

    दरम्यान, आता या वादामुळे आगामी काळात बागेश्वर बाबांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा