• Sun. Jun 14th, 2026
    Petrol Diesel Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारावर कडक कारवाईचा इशारा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं आहे. केवळ पॅनिक बायिंगमुळे काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पण पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार आहे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : राज्यात पेट्रोल पंपांवर अचानक वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल ‘लॉकडाऊन’ लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. मात्र, या सर्व अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे फेटाळून लावत राज्यात कुठल्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल-डिझेलची पॅनिक बाईंग करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. “केंद्र सरकारने सांगितले आहे की, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दर महिन्याला जितके पेट्रोल डिझेल आवश्यक असते, तितका पुरवठा सरकारकडे नियमितपणे उपलब्ध असतो. केंद्र सरकारकडूनही वारंवार इंधनसाठा पुरेसा असल्याची माहिती देण्यात येत असतानाही काही ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून जास्तीचे पेट्रोल भरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ‘पॅनिक बायिंग’ मुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढते”, असे मुख्यमंत्र्यांनी केले.

    अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा व्यवस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात. मात्र, प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलची कमतरता नसताना लोकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

    यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलचा काळाबाजारा बाबतही इशारा दिला. जर कुठे पेट्रोल किंवा डिझेलचा काळाबाजार होत असल्याचे आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    खताच्या खपात ७० टक्क्यांनी वाढ

    दरम्यान, खतांच्या साठ्याबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात डीएपी खताच्या खपात तब्बल ७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. ही वाढही पॅनिक बायिंगमुळेच झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्यक तेवढा खतसाठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरवठादारांवरही कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्री यांनी दिला दिला. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची सरकार दक्षता घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा