किनवट
३० मार्चपर्यंत कर भरणा करण्याचे मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांचे आवाहन; अन्यथा जप्तीची मोहीम तीव्र करणार
नगर परिषद प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध आता कंबर कसली असून, वारंवार सूचना देऊनही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारक, गाळेभाडे, जमीन भाडे, पाणी पट्टी धारकांवर ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज, २४ मार्च रोजी शहरात मोठी कारवाई करत नगर परिषदेने दोन व्यावसायिक गाळे सील केले आहेत. या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जमीन भाडे, गाळे भाडे, मालमत्ता कर आणि पाणी पट्टीचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध नगर परिषद किनवट सध्या ‘ॲक्शन मोड’वर आहे. आजच्या मोहिमेत शहरातील दोन मोठ्या थकबाकीदारांचे गाळे जप्त करून त्यांना सील ठोकण्यात आले. आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने प्रशासनाने वसुलीसाठी आक्रमक पाऊल उचलले आहे.
या कारवाईबाबत बोलताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मुगाजी काकडे यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी ३० मार्च २०२६ पूर्वी आपल्याकडील सर्व थकीत पाणीपट्टी, मालमत्ता कर, गाळे भाडे आणि जमीन भाड्याचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे. जे नागरिक मुदतीत कर भरणार नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली जाईल.या धडक मोहिमेत नगर परिषदेचे कर विभाग प्रमुख श्री. घुले,
श्री संमुखराव,श्री स्वानंद मामीलवाड,श्री कैतवाड, राजु पिल्लेवार,परमेश्वर कचमोडे, अनिल माहूरकर, गंगाधर दोनपेलीवार यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व पथक उपस्थित होते. आगामी आठवड्यात ही मोहीम शहरातील विविध भागांत राबवली जाणार आहे.
जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी आजच आपला कर भरून सहकार्य करण्याचे आव्हान न. प ने केले आहे.
