KDMT AC Bus: तापमानाचा पारा चढत असताना प्रवाशांचा एसी लोकल आणि एसी बस सेवेकडे कल वाढताना दिसत आहे. अशात सेवा अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करत प्रवास करावा लागणार आहे.
शुक्रवारपासून सेवा बंद
मुंबई महानगर प्रदेशात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वातानुकूलित सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रेल्वेच्या वातानुकूलित लोकल गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढत आहे. तर ठाणे, नवी मुंबई, एसटी महामंडळाकडूनही वातानुकूलित सेवांकडे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे केडीएमटीकडूनही वातानुकूलित बसगाड्यांची सेवा वाढवण्याची मागणी होत आहे. केडीएमसी प्राधिकरणांकडून जेमतेम आठ मार्गांवर वातानुकूलित सेवा दिली जात आहे. परंतु या वातानुकूलित सेवा देण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराचे कंत्राट आठ महिन्यांपूर्वी संपल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कल्याण-डोंबिवलीतील सर्व मार्गांवरील एसी बससेवा बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
Mumbai Metro: भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’, कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद
शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयामध्ये परिवहन विभागाचा सुमारे २२६ कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आला. यावेळी १०० नव्या बसगाड्यांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीकरांना सुविधांची घोषणा करण्यात आली. परंतु त्याचवेळी शहरातील केडीएमटीच्या वातानुकूलित सेवा ठप्प झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने नागरिकांमध्ये सक्षम असंतोष निर्माण झाला आहे.
लोकप्रतिनिधींनी तात्काळ निर्णय घ्यावे !
प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधी निवडून आल्याने शहरातील या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वातानुकूलित सेवा तात्काळ सुरू कराव्यात. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना एसीबस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करण्याची मागणी डोंबिवली एमआयडीसीतील राजू नलावडे यांनी केली आहे.
Dahisar-Mira-Bhayander Metro: मुंबई मेट्रो 9चा मार्ग मोकळा! काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण; एप्रिल महिन्यापासून प्रवास सुरू
संपूर्ण उन्हाळ्यात सेवा बंद ?
डोंबिवली स्थानकाबाहेरून बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी निवासी भागात जाणाऱ्या वातानुकूलित बस सेवेला या भागातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने या बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत होती. परंतु शनिवारी सकाळपासून ही बस बंद झाल्याचे कळल्याने नागरिक हवालदिल झाले. त्यामुळे प्रवाशांकडून परिवहन प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर अधिकाऱ्यांकडून कंत्राट संपल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण उन्हाळ्यात प्रवाशांना सामान्य बसमधून प्रवास करावा लागण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
