• Tue. Jun 16th, 2026
    Manmad Indore Rail Update : नर्मदेवर सर्वात मोठा पूल, 30 नवे स्टेशन, तब्बल 224 पूल आणि 9 बोगदे; मनमाड-इंदूर रेल्वेला वेग, धुळे, नाशिकसह 6 जिल्ह्यांचे चित्र बदलणार

    Manmad Indore new railway line: १८०३६ कोटी रुपये खर्चून उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा मनमाड- इंदूर हा मोठा रेल्वेप्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धुळे: उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या मनमाड-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकल्पाच्या उर्वरित सुमारे ३०९ किलोमीटर लांबीच्या भागाला मंजुरी दिली असून संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी बोरविहीर-नरडाणा या सुमारे ५१ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे या भागाचा अपवाद वगळून उर्वरित रेल्वे मार्गासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला त्यामुळे नवी गती मिळाली आहे.

    महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी महत्त्वाचा रेल्वे दुवा

    मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, धार आणि इंदूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांतून जाणार आहे. मालेगाव ते महू या दरम्यान हा रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर धावणार आहे. तसेच मनमाड या प्रमुख रेल्वे जंक्शनशी जोडला जाणार असल्याने देशातील विविध भागांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती माजी खासदार सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    ३० नवीन स्थानकं उभारणार

    या प्रकल्पात एकूण ३४ स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी ३० नवीन स्थानके उभारली जाणार असून चार विद्यमान स्थानकांचा वापर करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशात १८ तर महाराष्ट्रात १६ स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागालाही रेल्वे नेटवर्कचा मोठा लाभ मिळणार आहे.

    Maharashtra TimesUS Iran Peace Deal Explained: अमेरिका-इराणमध्ये शांतता करार, फक्त स्वाक्षऱ्या बाकी; तेवढ्यात इस्रायलची स्पष्टोक्ती, ‘आम्ही लागू करणार नाही!’

    १,७०१ हेक्टरचे अधिग्रहण

    प्रकल्पासाठी एकूण १,७०१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामध्ये १,४२०.५ हेक्टर खाजगी जमीन, २४३ हेक्टर सरकारी जमीन आणि ३७ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत सुमारे ७०९ हेक्टर जमीन तर मध्य प्रदेशात सुमारे ९०५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

    बोगदे आणि पुलांचे जाळे

    प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशात सात बोगदे बांधण्यात येणार असून त्यांची एकूण लांबी सुमारे १० किलोमीटर असेल. यातील सर्वात मोठा बोगदा ६.२ किलोमीटरचा असणार आहे. महाराष्ट्रात दोन बोगदे प्रस्तावित असून त्यांची एकूण लांबी ३.५ किलोमीटर असेल.

    याशिवाय मध्य प्रदेशात नर्मदा, चंबळ आणि देव नदीवर महत्त्वाचे पूल उभारले जाणार आहेत. नर्मदा नदीवरील पूल हा सर्वात मोठा असेल. मध्य प्रदेशात १३३ तर महाराष्ट्रात ९१ पूल बांधले जाणार आहेत. गिरणा, तापी आणि अरुणावती नद्यांवरील पूल या प्रकल्पातील महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे मानले जात आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा