Crime News: आमचे प्रेमसंबंध असल्याने तुम्ही हा विवाह रद्द करा, असं सासरच्या मंडळींना खोटे सांगून आरोपीने तरुणीचं ठरलेलं लग्नच मोडलं. या घटनेनं तरुणी आणि तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर याद राख, अशी धमकी देत पीडित तरुणीवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न आरोपीने केला होता. पीडित तरुणी कायनेटिक चौक परिसरातील गजराज हॉटेलसमोरून घरी जात होती. यावेळी तुषार अर्जुन हरेल (रा. येलुलकर चाळ, रेल्वे स्टेशन परिसर, अहिल्यानगर) याने तिला रस्त्यात अडवलं आणि आरोपीने भररस्त्यात तरुणीचा हात धरत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यापूर्वी आरोपीने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने तिला अडवलं आणि तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस, तर याद राख, अशी उघड धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला.
तरुणीवर दबाव टाकल्यानंतर आरोपीने आणखी एक धक्कादायक पाऊल उचललं. त्याने तरुणीच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींशी संपर्क साधला आणि आमचे प्रेमसंबंध आहेत, तिच्याशी लग्न करू नका, असं खोटे सांगून त्याने तरुणीचं ठरलेलं लग्नच मोडलं. या प्रकारामुळे तरुणी व तिच्या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आहे.
दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तुषार हरेल या आरोपीविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरदले करत असून नगर शहरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
