• Sun. Sep 13th, 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 9, 2026
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

मुंबई, दि. ९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित “खंजिरीचे बोल” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यात अॅड. शेलार बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, चित्रपटाचा अभिनेता प्रसाद ओक, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, जीवनात केवळ सुखाचा पाठलाग न करता समाधानाचा शोध घेणे हीच मानवी उत्क्रांतीची खरी दिशा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तन, भक्ती आणि ग्रामसेवेच्या माध्यमातून समाजाला समाधानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या ‘ग्रामगीता’मधून ग्रामविकास, आध्यात्मिक उन्नती आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संदेश दिला गेला आहे. आज जग विकासाचे खरे मॉडेल शोधत असताना राष्ट्रसंतांनी दिलेला ग्रामविकासाचा मार्ग अत्यंत पायाभूत आणि वास्तववादी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महान वारसा जतन-संवर्धन करण्याबरोबरच तो जगासमोर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत या चित्रपट निर्मितीत शासनाचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पाठपुरावा करून मार्गदर्शन करत असल्याचेही अॅड. शेलार यांनी सांगितले.

या चित्रपटासाठी दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या नेतृत्वाखालील टीमने जबाबदारी स्वीकारल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी कलाकार प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. हा चित्रपट भावी पिढीला विकासाचा खरा मार्ग दाखवणारा ठरेल आणि भक्तीबरोबरच सेवेमध्येही समाधानाचा मार्ग आहे, हा संदेश देश-विदेशात पोहोचवेल, असा विश्वासही मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य विभागातर्गत चरित्रपट योजना राबविण्यात येते. या योजनेतर्गत हा चित्रपट निर्माण होत आहे. कल्चर कॅनवास इंटरटेमेंट ही संस्था निर्मितीचे काम करत आहे. यावेळी चित्रनगरीच्या विशेष कार्यकारी अधिकारी सुचित्रा देशपांडे, कल्चर कॅनवासचे कार्तिकी आणि शिवम यादव, डॉ.संतोष फुटाणे उपस्थित होते.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed