• Sun. Jun 7th, 2026

    Rohit Pawar: अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीच्या विमानतळाची रेकी? स्थानिकांच्या माहितीच्या आधारे रोहित पवारांचा दावा

    Rohit Pawar: अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीच्या विमानतळाची रेकी? स्थानिकांच्या माहितीच्या आधारे रोहित पवारांचा दावा

    Ajit Pawar Plane Accident: अजित पवार यांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला. त्यात अनेक चुका असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

    अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीच्या विमानतळाची रेकी? स्थानिकांच्या माहितीच्या आधारे रोहित पवारांचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना उलटल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अतिशय मूलभूत चुका आहेत. या चुका जाणीवपूर्वक केल्या जात असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ‘नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए) नेमके कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा प्रश्न करताना, ‘व्हीएसआर कंपनीचे मालक आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, सरकार आमची विमाने वापरत आहेत असा दावा करत आहेत. हा आत्मविश्वास नेमका कुठून आला, नेमका कुणाचा वरदहस्त यांच्या शिरावर आहे,’ असंही पवार यांनी विचारलं.

    ‘बारामती विमानतळ परिसरात अपघाताआधी काही जण विमानतळाची रेकी करण्यासाठी आले होते, असा दावा असून, यात सीआयडी व सीआयबीने लक्ष घालावे,’ अशी मागणी रोहित पवारांनी केली. ‘प्राथमिक अहवालात विमानतळाच्या रनवे २९ सोडून ११वर उतरविण्याचा प्रयत्न झाला हेदेखील सिद्ध होत आहे. मुख्य वैमानिक काही बोलत नव्हता हे ट्रान्सक्रिप्टमध्ये दिसत आहे,’ असंही ते म्हणाले.

    ‘एखाद्या अतिमहत्त्वाच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत असताना यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करते, मात्र, हा अहवाल पाहता कमालीची निष्काळजी असल्याचे दिसत आहे. अहवालात बारामतीचा उल्लेख जिल्हा असा केला असून, बारामती महापालिका असाही उल्लेख आहे. एएआयबीचे गांभीर्य यातून दिसत आहे. अहवालात विमान झाडांना धडकल्याचे म्हटले आहे, परंतु अपघातस्थळी कुठलीही झाडे नाहीत, साध्या झुडुपालाही स्पर्श झाला नव्हता. परंतु द्यायचा म्हणून अहवाल दिला. झाडांवर जबाबदारी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे,’ असा हल्लाबोलही रोहित पवारांनी केला आहे.

    ‘मी व्हीएसआर, डीजीसीएच्या विरोधात नाही, आमच्यात काही वैर नाही. परंतु, या निष्काळजी असलेल्या डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे फौजदारी आणि तांत्रिक दृष्टीने पाहावे लागेल,’ असेही पवार यांनी सांगितले. ‘अनेक राजकीय व्यक्ती अपघातातील दोषींना वाचविण्यासाठी कामाला लागले असून, चौकशी निष्पक्ष झाली तरच हे सर्व उघड होईल,’ अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा