इराण-इस्रायल युद्धाच्या भडक्यामुळे सातारा जिल्ह्यातील ३४ जण दुबईत अडकले आहेत. हेल्थ इन्शुरन्सच्या सेमिनारसाठी गेलेले हे कर्मचारी सध्या हॉटेलमध्ये सुरक्षित असून, त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
नवी दिल्लीतील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत. कंपनीने दुबईत एका सेमीनारचे आयोजन केले होते. त्या सेमीनारसाठी सातारा जिल्ह्यातील ३४ जणांची निवड झाली होती. २७ फेब्रुवारीला सर्वजण दुबईला रवाना झाले होते. मात्र, त्यानंतर आखाती देशात युद्धाचा मोठा भडका उडाला. इराणने संयुक अरब अमिरातीवर हल्ले सुरू केले. दुबईला देखील लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांसह व्यावसायिक कारणांसाठी गेलेले हजारो लोक दुबईत अडकले आहेत.
Government Hostel GR : शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ शब्द वगळला; महापुरुषांची नावे मिळणार, सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय
दुबईतील प्रशासनाने परदेशी लोकांची संपुर्ण सोय मोफत केली आहे. परंतु, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरीक भयभीत आहेत. साताऱ्यातील लोक एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. हॉटेलबाहेर पडू नये, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप तरी आम्हाला कसलाही धोका जाणवला नसल्याची माहिती केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या कराड शाखाधिकारी साधना पाटील यांनी सांगितले. तसेच विमानाची व्यवस्था होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.
दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. ताज्या अहवालांनुसार, २७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये आतापर्यंत ७८० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलमध्येही मृतांची संख्या तुलनेने कमी असली, तरी शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.
