• Tue. Jun 16th, 2026
    Satara News : लगीनघर दु:खाने वेढलं, भावाच्या लग्नासाठी जवानाने सातारा गाठलं, पण सुट्टी शेवटची ठरली

    सावत्र भावाच्या लग्नासाठी गावी आलेल्या जवानाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जवानाचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : साताऱ्यात एका कुटुंबात आनंदाच्या वातावरणाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाचा साताऱ्यात लग्नासाठी गावी आले असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सावत्र भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या आणि दोन दिवस बेपत्ता असलेल्या कोरेगाव तालुक्यातील जवानाचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सूरज सयाजी नलवडे (वय ३५), असे मृत जवानाचे नाव आहे. ते नलवडेवाडी गावचे रहिवासी होते. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव येथील कृष्णा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने रहिमतपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

    सूरज नलवडे हे सैन्य दलात होते. त्यांचा सावत्र भाऊ संकेत याचे मागील रविवारी (२६ फेब्रुवारी) लग्न होते. भावाच्या लग्नासाठी सूरज रजा घेऊन गावी आले होते. त्याच दिवशी रात्री ते बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने शोधाशोध केली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. दोन दिवस शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

    रहिमतपूर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असतानाच रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास नांदगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ बोरगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. तो सूरज नलवडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान, जवान सूरज नलवडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कारण शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. सावत्र भाऊ संकेत याच्या लग्न सोहळ्यात सूरज हे आनंदाने सहभागी झाले होते. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार संतोष चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा