• Mon. Mar 16th, 2026

    आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 3, 2026
    आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय – महासंवाद

    मुंबई, दि. ३ : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

    तसेच केंद्र सरकारसोबतही समन्वय ठेवून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित दूतावास, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या संपूर्ण समन्वय कार्यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्र शासनाला सर्वतोपरी मदत केली जात असून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

    दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने मदतीसाठी एक विशेष व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. आखाती देशांमध्ये अडचणीत असलेल्या किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी व्हॉटसॲप क्रमांकाद्वारे : +97150 365 4357 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

    0000

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed