• Mon. Jul 27th, 2026

    Uddhav Thackeray : ‘जेन झी’ आंदोलन ते केंद्र सरकावर जोरदार घणाघात, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत; ‘त्या’ तरुणीची आठवण करुन दिली

    Uddhav Thackeray : ‘जेन झी’ आंदोलन ते केंद्र सरकावर जोरदार घणाघात, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत; ‘त्या’ तरुणीची आठवण करुन दिली

    Uddhav Thackeray Samana Interview : ‘आम्ही तुम्हालाच बदलून टाकू, उखडून टाकू देशातून या एका निश्चयानं जनता आता रस्त्यावर उतरलीय आणि हे आता घाबरून बिळात गेले’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

    उद्धव ठाकरे सामना मुलाखत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशात इतिहास घडवला. मोदी सरकारमधील एखाद्या केंद्रीय मंत्र्यानं पहिल्यांदाच राजीनामा दिला. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण देशभरात पोहोचलं. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात येताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा देत असल्याची घोषणा ट्विटरवरून केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सामना दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांची ही मुलाखत घेतली.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    ‘मुंबईपासून दिल्लीपर्यंत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे, जनता आता भीतीच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत सरकारनं एक भीतीची बंदूक त्यांच्या मस्तकावर रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं झुगारून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनता रस्त्यावर उतरली आहे, का उतरणार नाही?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आंदोलनावर केला आहे.

    ‘ जेन झी ‘ रस्त्यावर का उतरली?

    ‘जेन झी’ रस्त्यावर का उतरली? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘2014 पासून भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला, त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी हे सरकार नकारघंटाच वाजवत आहे. रोजगार मिळताहेत का?, महागाई कमी झाली का? पेट्रोलचे भाव उतरले का?, गॅसचे दर उतरले का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ सुरू झाली. रस्त्यावर खड्डे पडत आहेत. पूल पडत आहेत. पक्ष फोडले जात आहेत. राम मंदिराची दान पेटी फोडली गेली आहे. लुटली गेली आहे. पेपर फुटत आहेत. म्हणजे या सरकारला कशाचं ही सोयरसुतक उरलं नाहीय. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. या सरकारने देशाला बरबाद केलं आहे’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    ‘ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली’

    देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणाच्या केलेल्या हेटाळणीचा समाचार उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून घेतला. ‘देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्यांनी प्राण दिले. त्यांचं वय किती होतं? ते जेन झीचं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, हे विसरताय का तुम्ही?’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली’, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

    ‘तिचे कपडे फाडले गेले’

    एक मुलगी विव्हळून सांगत होती, आक्रोश करत होती. तिच्या मनात उद्वेग होता. तिचे कपडे फाडले गेले. मुलींना मारहाण करण्यात आली. काठीला खिळे लावून अनेकांना मारहाण करण्यात आली. या गर्दीत त्यांनी गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांच्या हातात पोलिसांचे दांडके दिले होते. मुलींना कशा पद्धतीने वागवलं हे क्रौर्य सत्तेच्या माजातून येत असल्याचा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. जंतर मंतरवर देशाचे भाग्यविधाते उभे होते त्यांच्यातील ती हिंमत बघून मलाही वाटलं की, देश जिवंत आहे. हा जिवंतपणा जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत आपल्या देशात हुकूमशाही येऊ शकत नाही. हा एक आत्मविश्वास मला मिळाला, असं या आंदोलनाचं फलित काय ते उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.