• Sat. Mar 7th, 2026

    Ratnagiri News : चिपळूणमध्ये नगरसेवकाच्या चालकावर हल्ला, चौघांकडून गाडीत कोंबून मारहाण

    Ratnagiri News : चिपळूणमध्ये नगरसेवकाच्या चालकावर हल्ला, चौघांकडून गाडीत कोंबून मारहाण

    चिपळूणमध्ये एका नगरसेवकाच्या चालकाला गाडीत कोंबून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चालकाने काही जणांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण नगर परिषदेतील तरुण नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकाला सोमवारी (2 फेब्रुवारी) रात्री चौघांनी गाडीत कोंबून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मजरेकाशी येथील रहिवासी फैजल कर्जीकर हे गेल्या दोन महिन्यांपासून साजिद सरगुरोह यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री काही व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण केली. या घटनेत एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

    जखमी अवस्थेत फैजल कर्जीकर यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे चिपळूण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    मारहाणीवर फैजल कर्जीकर याचे गंभीर आरोप, काय-काय म्हणाला?

    “मी नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या घरुन फॅक्ट्रीची चावी घेऊन आलो. मी कुलूप खोलत असतानाच मागून एक इनोव्हा कार आली. त्यातून अमान नारकर, तबिज पेचकर आणि समीर पेचकर हे गाडीतून उतरले. पेचकर बंधू हे माझ्या पत्नीचे दोन्ही मामा आहेत. ते गोलको रोडला राहतात आणि अमान नारकर हे खेडमध्ये राहतात. अमान नापकरने माझं तोंड दाबलं आणि पेचकर बंधूंनी मला गाडीत टाकलं. मला बोलायला जमत नव्हतं कारण माझं तोंड दाबलं होतं. त्यांनी गाडीतून नेलं.”

    “मला त्यांनी आळीपाळीने मारहाण केली. पुढे मुस्कान दलवाई नावाची व्यक्ती गाडीत बसली. त्या व्यक्तीने देखील मारहाण केली. लोटे बाहेर गाडी बाहेर पडली. तिथून पुढे जावून मला मारहाण केली. विशेष म्हणजे मला ट्रान्सफॉरमर जवळ नेवून वीजेचा शॉक देवून जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यांनी मला अमानुषपणे मारहाण केली.”

    “ते व्हिडीओ बनवू इच्छित होते. त्यांना हवं ते व्हिडीओत बोलला नाहीस तर तुला ठार मारुन टाकेल, अशी अमान नारकर याने धमकी दिली. त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती व्हिडीओ बनवून घेतले की, मी माझ्या बायकोला जबरदस्ती पळवून आणलं, तिच्यावर अत्याचार केले. तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. मला आता शासनाकडून न्याय हवा.”

    “माझी बायको मेहक दलवाई हिला 24 फेब्रुवारीला उपवास सोडून तिला तिच्या आजीच्या घरी सोडलं. त्यानंतर रात्री अकरा वाजता आमच्या घरी गेलो. आम्ही प्रेम विवाह केला. आम्ही दोन वर्षांपूर्वी पळून जावून लग्न केलं. त्यानंतर 7 जानेवारीला 2025 मध्ये रितसर कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात आम्ही जमा झालो.”

    “या घटनेनंतर माझे शेठ नगरसेवक साजिद सरगुरोह हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते माझ्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहीले. मी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो तेव्हा माझ्या तक्रारीनुसार तक्रार घेतली नाही. मला न्याय हवा.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा