सातारा जिल्हा परिषदेच सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सोबत न घेता सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता मंत्री शंभुराज देसाई यांच्या नव्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता सातारा जिल्हा परिषदेत स्थापन होईल का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
या घडामोडींनंतर शंभूराज देसाईंनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा खुलासाही केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा गुंता कायम असून महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या रणनीतीला समजून घेत आहेत. सत्ता स्थापनेबाबत भाजपकडून प्रस्ताव आल्याशिवाय त्यांच्याशी कोणती चर्चा होणार नाही, असे थेट स्पष्टीकरण साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. शिवसेना पक्षाने चांगले यश मिळवले आहे. विजयी सदस्यांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही गट नोंदणी प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सत्ता स्थापने संदर्भातील प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, भाजप नेते जे बोलतात ते करत नाहीत. मिठी मारण्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, ते फारसे गांभीर्याने नव्हते. सत्कार मेळाव्यामध्ये आम्ही आज आमच्या सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्याचा सविस्तर अहवाल सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. सत्ता स्थापनेबाबत जो काही निर्णय होईल ते तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.
सातारा जिल्ह्यात भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना एकत्र आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार महायुतीतील तिन्ही पक्षांना एकत्र चर्चा करावी लागल्यास आम्ही समोरासमोर बसून चर्चा करू. भाजपशी चर्चा करताना मी आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आम्ही दोघे चर्चा करणार आहोत, असेही शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
